रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

फॅसिस्ट मनोवृत्ती रोखण्याचे ‘अंनिस’ला आव्हान



फॅसिस्ट मनोवृत्ती रोखण्याचे ‘अंनिस’ला आव्हान
दाभोलकर, कार्यक्रम, विरोध, फॅसिस्ट वृत्ती

‘अंनिस’ शाखांच्या कामात अनेक कारणांनी चढउतार होत असतात. एखाद्या कालखंडात प्रभावीपणे काम करणाऱ्या शाखेचे कार्य काही कारणांनी नंतर थांबते. ते जसे थांबते तसेच काही वेळेला, काही काळानंतर उसळी मारून वर येते. पनवेल शाखेचे काहीसे असेच झाले. एकेकाळी ही शाखा अत्यंत कृतिशील होती. महाराष्ट्रव्यापी काही प्रमुख मोहिमा पनवेल येथून निघाल्या किंवा पनवेल येथे त्यांचा समारोप झाला. समितीचे वार्तापत्र काही काळ पनवेल येथूनच प्रकाशित होत होते. पुढे काही ना काही कारणांनी ‘पनवेल’चे काम हळूहळू थांबले. अलिकडच्या काळात पुन्हा एकदा ‘पनवेल’ने जोर पकडला. पनवेल शाखा उत्तम प्रकारे कार्यक्रम आयोजित करते, असे ऐकत होतो. प्रत्यक्षात कार्यक्रमाला जाण्याचा योग आला, तो माझ्या पुस्तकाच्या ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने.
     
कार्यक्रमाची भरपूर आणि नीट तयारी पनवेल शाखेने केली होती. वातावरणनिर्मिती चांगली झाली होती. ‘अंनिस’चे कार्यक्रम जोरात होणार, असे दिसू लागले की, स्वत:ला सनातनी धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्यांच्या पोटात दुखू लागतेच. कार्यक्रमाच्या दिवशीच १०० जणांचा जथ्था पोलिस स्टेशनला थडकला. माझे नाव घेऊन त्यांनी भाषणबंदी आणण्याची मागणी केली. त्यावेळी गडबडून न जाता ‘पनवेल’चे साथी खंबीर राहिले. अर्थात, पोलिसांचा दृष्टिकोनही आपल्याला सहकार्याचा होता. त्यांनी भाषणात अमुक-अमुक नसावे (उदा. हिंसेची चिथावणी, धार्मिक भावना दुखावणे इ.) अशी नोटीस माझ्यावर बजावली. मात्र हा आमचा नोकरीचा नाईलाज आहे, अशीही खंत बोलून दाखवायला ते विसरले नाहीत. अशा परिस्थितीत सत्याग्रही वृत्तीने नोटीस स्वीकारणे मला योग्य वाटते. तशीच ती याही वेळा मी स्वीकारली. नोटीस स्वीकारून काहीच फरक पडत नाही. आपल्याला बोलावयाचे ते बोलता येतेच; परंतु त्यामधून स्थानिक पोलीस प्रशासनाशी कार्यकर्त्यांचे सहकार्याचे संबंध जुळू शकतात. त्याचा काम करताना त्यांना फायदा होऊ शकतो.

कार्यक्रमाच्या हॉलमधील वातावरण कार्यकर्त्यांच्या उमेदीमुळे उत्साही होते. पोलीस बंदोबस्त भरपूर होता; परंतु तणाव नव्हता. कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला. कार्य घरचेच आहे, या भावनेने आरती नाईक, महेंद्र नाईक, महेंद्र पाटेकर, मनस्वी पाटेकर, मनोहर तांडेल, संतोष टकले, प्रसाद शहा, धनाजी फडके, मधुश्री, उल्हास ठाकूर भरपूर राबले. आरती नाईकने सूत्रसंचालन उत्तम प्रकारे केले. ते इतके प्रभावी ठरले की, सोनाली कुलकर्णीने तिला आपणहून दाद दिली. कार्यक्रम संपला. महेंद्र पाटकरांच्या घरी सर्व सहकाऱ्यांचे एकत्रित भोजन झाले. त्याचा बेतही साधा, सुटसुटीत होता. पनवेल येथे शाखेची चांगली टीम उभी राहत आहे, याचे समाधान घेऊन मी पनवेल सोडले. अर्थात, रायगड जिल्ह्याचे सहकार्य सतत पनवेल शाखेसोबत आहेच. कार्यक्रमालाही नितीन राऊत, नीलेश घरत, रोहिदास गायकवाड, तुकाराम शिंदे, श्रीमती जेधे, श्रीमती जोगळेकर हे कार्यकर्ते आले होतेच. पनवेल शाखेचा उल्हास ठाकूर हा तसा सर्वात जुना कार्यकर्ता असावा. त्यांनी पनवेल शाखेच्या नव्या उभारीबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले.

आणि हो, एक महत्त्वाचे सांगायचे राहिलेच. पनवेल शाखेचा अध्यक्ष संतोष टकले हा उत्साही तरुण आहे. तो भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. उत्तम सामाजिक बांधिलकी असलेला संतोष टकले पनवेल शाखेचा अध्यक्ष तसा अलिकडेच झाला. अत्यंत अल्प किमतीत खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी तो संगणक वर्गही चालवतो. त्याने अगदी सहजपणे आणि कसलाही गाजावाजा न करता ५० हजार रुपयांची देणगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली.

पनवेल शाखेची ही वाटचाल सुखावणारी आहे. ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ती प्रत्यक्ष अनुभवायास मिळाली, हा मोठाच फायदा झाला.

ग्रंथार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी जे कार्यक्रम झाले, त्यात काही वेगवेगळे मुद्दे पुढे आले. ते समितीच्या कार्याची उपयुक्तता, सामर्थ्य वा आव्हाने दाखवतात. त्यातील दोन मुद्दे असे-

१) पुणे येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी असा मुद्दा मांडला की, समिती ज्या स्वरुपाचे काम करते, त्या कामात एक धोका असतो, तो म्हणजे लोकांपासून एलिनेट होण्याचा; म्हणजेच अलग पडण्याचा. अंधश्रद्धा निर्मूलनार्थ जी बौद्धिक, वैचारिक मांडणी करावी लागते, त्यामध्ये धारदार युक्तिवाद असतो. दुसरीकडे, अंधश्रद्धांचा उपहास असतो. समोरच्या माणसाशी संवाद साधायला या दोन्ही बाबी उपकारक नाहीत. धारदार युक्तिवाद करणाऱ्या माणसांबद्दल एक प्रकारचा परकेपणा वाटतो. इतरांविषयी तुच्छभाव जाणवतो. दुसरीकडे, ज्या अंधश्रद्धा असतात, त्यांचे महत्त्व त्या व्यक्तींच्या लेखी खूप असते. त्यामुळे त्यांची खिल्ली उडवणारी व्यक्ती त्यांना परकी वाटते. या दोन्हीचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे सर्वसामान्य लोक चळवळीपासून अलग पडतात. विवेकवादी चळवळीबद्दल हे महाराष्ट्रात काही प्रमाणात घडून आलेले आपण पाहतो. गेली २० वर्षे प्रत्यक्ष मैदानात असूनही हा धोका टाळण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती यशस्वी झाली आहे, याबद्दल प्रा. जाधव यांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे हे प्रतिपादन ऐकल्यानंतर मला जाणवले की, यापूर्वी हा मुद्दा आपल्या कधी लक्षातच आला नव्हता. ही बाब अजाणता घडून आलेली आहे. तरीही ती कशाप्रकारे घडून आली, याचा शोध घेणे उद्बोधक ठरेल.

२) मुंबई येथे प्रा. डॉ. सुधीर पानसे यांनी आधुनिक बुवाबाजीचा मुद्दा संभाव्य फॅसिझमशी जोडून दाखवला. त्यांचे मत असे की, सध्याच्या बुवा-बाबांना मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. हे अनुयायी बाबांचा शब्द अंतिम प्रमाण मानतात. त्याबाबत प्रतिवाद करणारा कोणताही तर्क वा युक्तिवाद त्यांना अजिबात खपत नाही आणि एवढेच नव्हे, तर असे वैचारिक जनजागरण करणाऱ्या लोकांचा, संघटनांचा ते हिंसक प्रतिवाद करतात. डॉ. पानसे यांच्या मते, एखाद्याचे शब्द प्रामाण्य मानणे, त्याबाबत कोणताही प्रतिवाद न ऐकणे आणि कोणी तसा करण्याचा प्रयत्न केल्यास हिंसा वापरून तो आवाज बंद करणे, हे सर्व फॅसिस्ट मनोवृत्तीचे लक्षण आहे. आपल्या समाजात आज ज्या पद्धतीने बुवा, बाबा वाढत आहेत, त्या पद्धतीने विचार केला तर समाजात फॅसिस्ट वृत्तीची वाढ होण्यासाठी अनुकुलता तयार होत आहे, याची ती खूण आहे. यामुळे लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होऊ लागते. काही प्रमाणात महाराष्ट्रात ही सुरुवात झालेली आहे. ‘अंनिस’च्या कार्याला पुढचे आव्हान हेही फॅसिस्ट मनोवृत्ती समाजात पसरू नये, यासाठी करावयाच्या संवादाचे आहे.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून २०१०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...