पुढचे पाऊल पुढेच
टाकू
दाभोलकर, चळवळ, कायदा
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या
सर्व वाचकांना उद्देशून अतिशय मनापासून आणि कळकळीने ‘विवेकसाथी’ हा शब्द वापरला आहे. चळवळीचा
कार्यकर्ता म्हणून सर्वांना उद्देशून असे खुले पत्र आपल्या मासिकातून यापूर्वी मी
लिहिलेले नाही. पण आज ती वेळ आलेली आहे. सोबतच्या पानावरील हिंदू जनजागृती समितीचे
आवाहन वाचल्यानंतर त्यासंदर्भात काही वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. सत्य आणि
अहिंसा हा कुठल्याही धर्माचा पाया असतो आणि या संपूर्ण पत्रकात असत्य पुरेपूर
भरलेले आहे. कोणत्याही धर्मकृत्यावर कसलाही आघात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने होणार
नाही. भारतीय घटनेत व्यक्तीला धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. समिती त्याचा
संपूर्ण आदर करते आणि या देशातील कोणताही कायदा या घटनेच्या मूलभूत ढांचाशी
सुसंगतच असावा लागतो, हे प्राथमिक भान कायद्याचा मसुदा तयार
करताना तज्ज्ञ विसरणे शक्यच नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव आणि धर्म बुडवायला निघालेली समिती आहे, हा प्रचार मी समितीच्या स्थापनेपासून ऐकत आहे. या विद्वेषी, विखारी, दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर मात करून
समितीचे कार्य वाढत चालले आहे. सर्व थरात मान्यता मिळवत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणे हे याच
मान्यतेचे एक रूप आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा जुनाच डाव अधिक संघटितपणे खेळण्याची
स्वत:ला धार्मिक म्हणवून घेणाऱ्या;
परंतु प्रत्यक्षात
धार्मिक नम्रतेचा व नैतिकतेचा लवलेश नसलेल्या संघटनांची चाल आहे. धर्माच्या नावाने
राजकारण करणे, प्रक्षुब्ध समाजकारण करणे हे ज्यांचे
इतिकर्तव्य आहे, ती मंडळीही मतलबी व चुकीचा टाहो फोडत
आहेत. देवाधर्माच्या नावाने लोकांचे शोषण, फसवणूक व दिशाभूल
करणाऱ्या अंधश्रद्धा व त्यांचे कर्ते यांच्या विरोधात आम्ही आहोत, हे न समजण्याएवढे ही मंडळी भोळी नाहीत. डोळे मिटून पेडगावला
जाण्याचे सोंग हे हेतपुरस्सर घेतले आहे. याचे कारण आम्ही समजून आहोत. आमच्या
संघटनेचे नाव ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ असले तरी, आमचे खरे उद्दिष्ट समाजमानस सुबुद्ध, शोधक व नैतिक करण्याचे आहे. या विवेकी मूल्यपरिवर्तनाच्या
कृतिशील संवादाचे आजचे साधन अंधश्रद्धा निर्मूलन आहे, एवढेच. संघटनेच्या वाढत्या
व्यापाबरोबर ही साधनेही विकसित व समर्थ होत जातील. आमच्या विरोधकांची खरी भीती ही
लोकांना डोळस, शहाणे करण्याची जी क्षमता आमच्या चळवळीत
निर्माण झाली आहे, त्याबद्दल आहे.
कारण त्यामुळे
लोकांना देवधर्माच्या नावाने भूलथापा देऊन स्वत:चे हितसंबंध सुखेनैव चालू
ठेवण्याच्या त्यांच्या धंद्याच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे. यामुळे ही
मंडळी कधीही समोरासमोर खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारत नाहीत. हिंसक पद्धतीने आमचे
कार्यक्रम उधळण्याचा यांचा अनुभव आम्ही अनेकवेळा
घेतला आहे. आम्ही आणि आमचे काम हे लोकहितवादी आहे
आणि ही मंडळी पेरत असलेले विचार हे लोकद्रोही आहेत हे परखड; पण कटुसत्य सांगणे भाग आहे. महाराष्ट्रात लगेचच होत असलेल्या
निवडणुकांच्यात हिंदुत्व हेच भारतीयत्व ही भूमिका बिंबवण्याची या विचाराच्या
पक्षांच्या मातब्बर नेत्यांनी जाहीर केली आहे. लोकांच्या धर्मभावना प्रक्षुब्ध
करणारे असे कार्यक्रमही या मतपेटीच्या लढाईची पूर्वतयारी आहे. महाराष्ट्रातील
सामाजिक व राजकीय पुरोगामी शक्ती याप्रसंगी आमच्या मागे सक्रियपणे उभ्या राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. हा पाठिंबा कृतिशील असावा, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा विवेकाचा वारसा पुढे नेते आहे, अशी आमची नम्रपणे ठाम धारणा आहे आणि असे
कितीही अडथळे आले तरी परिवर्तनवादी विचाराचे पाऊल पुढेच पडते, या जागतिक अनुभवाला महाराष्ट्रातही अपवाद नसणार, याबद्दल आम्ही नि:शंक आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
सप्टेंबर २००४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा