मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 1)



आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 1)

दाभोलकर, ब्राह्मण्यविरोध
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रारंभीच्या काळात एक आक्षेप समितीवर जोरदारपणे घेण्याचा प्रयत्न झाला. आजही समितीचे काम जेथे नव्याने सुरू होते, तेथे हा आक्षेप घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतो. याबरोबरच हिंदू जनजागरण समितीसारख्या ज्या संघटना सातत्याने ठरवून समितीच्या विरोधात विद्वेषी मोहीम चालवतात, त्यांच्याकडून अजूनही समिती फक्त हिंदू धर्माच्या विरोधातच काम करते, असे सातत्याने सांगितले जाते. या सर्व अपप्रचाराचा यशस्वी मुकाबला करून समितीचे कार्य जोरदारपणे सुरू आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत आणखी एक नवी हाकाटी समितीच्या विरोधात सुरू झाली आहे. बामसेफ या संघटनेने ती प्रथम सुरू केली. समिती ब्राह्मणी कर्मकांडांबद्दल, अंधश्रद्धांबद्दल, ब्राह्मण बुवा-बाबांच्याबद्दल बोलत नाही, चळवळ करत नाही, अशा स्वरुपाचे आक्षेप घेतले जाऊ लागले. अलिकडच्या काळात मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे समितीवर असा हल्ला अनेक ठिकाणी केला आहे. हा हल्ला पूर्णत: चुकीचा तर आहेच; परंतु परिवर्तनाच्या चळवळीच्या दृष्टीने तो वेदनादायी व हानिकारक आहे. वरील दोन्ही संघटनांशी समितीचे तात्त्विक मतभेद आहेत. तरीही व्यापक लढ्याच्या संदर्भात या संघटनांना समिती आपले मित्र मानते. यामुळेच जिथल्या तिथे व जाहीरपणे दिशाभूल करणाऱ्या या आरोपांना उत्तर देण्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी संयमाने व चळवळीचे व्यापक हित लक्षात घेऊन टाळले आहे. मात्र त्याबाबत सत्य परिस्थिती काय आहे, याचे भान सर्वांनाच यावे, यासाठी याबाबतची मांडणी या वर्षीच्या वार्षिकांकाच्या निमित्ताने करण्याचा हा प्रयत्न आहे.
आक्षेप काय आहे?
आक्षेप घेणाऱ्या संघटनांना असे वाटते की, वैदिक ब्राह्मणी धर्माच्या नावाने उभे राहिलेले मायाजाल हेच इथल्या शोषण व्यवस्थेचे मुख्य स्वरूप आहे. या स्वरुपाचे दृश्य रूप ब्राह्मणांच्या मार्फत व्यक्त होते. यातील काहीजण विरोध ब्राह्मण्याला आहे, ब्राम्हणांना नाही, असे प्रतिपादन करतात. परंतु बहुसंख्यांचा सूर हा स्पष्टपणे जन्माने ब्राह्मण असलेल्यांना विरोध, असाच असतो. ब्राह्मण्यग्रस्त नसलेले ब्राह्मण असतीलही कदाचित; परंतु आम्हाला ते भेटत नाहीत, भेटलेले नाहीत,’ असे त्यांचे म्हणणे असते. बाकीच्यांना तर या शब्दच्छलाची गरजही वाटत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक या त्यांच्या मुखपत्रातील मुसलमानांच्याबद्दलचे प्रतिपादन असे असते की, ‘प्रत्येक मुसलमान राष्ट्रद्रोही असतो असे नाही; परंतु राष्ट्रद्रोही मात्र मुसलमानच असतो. याच वाक्यात थोडा बदल करून या मंडळींचे म्हणणे मांडता येईल, ते असे-प्रत्येक ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणच असतो असे नाही; परंतु प्रत्येक ब्राह्मण मात्र ब्राह्मण्यग्रस्त असतोच. हा प्रचार का होत असावा, हे मी समजू शकतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आज महाराष्ट्रातील एक सशक्त संघटन आहे आणि एखाद्या धर्मातीलच अंधश्रद्धांचे निर्मूलन समिती करते, या आक्षेपाबद्दल समितीला बोलण्याची जशी गरज नाही,  तशीच एखाद्या जातीमधील कर्मकांडे, बाबा-बुवा याबद्दल समिती बोलतच नाही, या आरोपांनाही उत्तर देण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांनाही वस्तुस्थिती माहीत असावी इतक्या प्रमाणात ही उघड वस्तुस्थिती आहे, मग तरीही असे आरोप का होतात? याचे कारण वेगळेच आहे आणि ते नीटपणे समजून घ्यावयास हवे.
समितीचे कार्य प्रामुख्याने अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे हेच आहे आणि आपल्या १८० शाखांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात समिती ते करत आहे. १५ वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या या संघटनेने अंधश्रद्धांचे निर्मूलन किती प्रमाणात केले, हा मुद्दा घटकाभर बाजूस ठेवू. परंतु एक वेगळे सामाजिक वास्तव त्यामुळे महाराष्ट्रात साकारले गेले आहे. समितीची निर्मिती आणि तिची वाटचाल हाच कालखंड मंडल आयोग चळवळ, तो लागू होणे आणि सत्ता संपादनात त्याचे प्रभावी प्रतिबिंब उमटणे, याचा आहे. स्वाभाविक या कालखंडात उभ्या राहिलेल्या बहुसंख्य संघटना या बहुधा प्रत्यक्षपणे व काही वेळा अप्रत्यक्षपणे; पण प्रत्यक्षात जातीचा झेंडा घेऊन उभ्या राहिलेल्या दिसतात. जातीमुळे होणारे शोषण आणि त्यासाठी जातीचे निर्मूलन याची भाषा या संघटनेतील सर्वच जण बोलतात आणि प्रत्यक्षात जातीच्या संघटनेच्या आधारे जात बळकट करतात. समितीचे वैशिष्ट्य नेमके या ठिकाणी आहे. समितीने आपल्या बांधणीत अगदी सहजपणे जात ओलांडली आहे. एका बाजूला समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्यात शब्दश: असंख्य जातीचे कार्यकर्ते आहेत. समितीच्या शाखांची कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी यामध्ये बहुसंख्य बहुजनच आहेत. मात्र कधीही यापैकी एकाही पातळीवरील कार्यकारिणीची कोणत्याही वर्षीची निवड ही जातीचा विचार करून झालेली नाही. यामुळे प्रत्यक्षात जातनिरपेक्ष असे एक सशक्त संघटन उभे राहिले आहे. महाराष्ट्राच्या आजच्या सामाजिक वास्तवात ही उपलब्धी महत्त्वाची आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. याही पुढची एक बाब म्हणजे संपूर्ण संघटनेत गटबाजी आणि भांडणे नाहीत, याचाही अनुभव कोणीही तटस्थ निरीक्षक घेऊ शकेल. जात, धर्म यांच्या पलिकडे प्रत्यक्षात गेलेली आणि एकोपा जोपासून कार्यरत असलेली महाराष्ट्रव्यापी संघटना ही मानवी स्वभावातील स्वाभाविक असूयेपोटी टीकेचा विषय न वाटली तरच नवल.
कृतीच्या आघाडीवर
कोणत्याही चळवळीच्या मांडणीचा कस हा केवळ वैचारिक घटपटादी चर्चेत नसतो. जे तत्त्वज्ञान मांडले जाते, त्यासाठी त्या चळवळीचे कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतही किती प्रमाणात प्रत्यक्षात मैदानात उतरतात, यावरच या चळवळीचा कस ठरतो. याबाबत समितीच्या कार्याचा इतिहास अभिमान वाटावा असा आहे. समितीचा अंधश्रद्धाविरोधी संघर्ष चौफेर आहे. त्यामुळे त्यांच्या इतर अनेक पैलूंबरोबर ज्याला ब्राह्मणी स्वरुपाची कर्मकांडे म्हणतात, त्या विरोधात स्वाभाविकच समितीने सातत्याने संघर्ष केला आहे. बुवाबाजी आणि महाराज हे मानसिक गुलामगिरी निर्माण करणाऱ्या शोषणाचे उगमस्थान असतात. या विरोधात गेल्या १५ वर्षांत समितीने जेवढे संघर्ष केले, तेवढे महाराष्ट्रात क्वचितच कोणी केले असतील. हे लढे करताना समितीने कधीही बुवांची जात आणि धर्म पाहिला नाही. परंतु स्वाभाविकच ब्राह्मणी कर्मकांडे, त्याला प्राधान्य देणारे बुवा-बाबा त्यात आलेच. या सर्व बाबी काही तपशिलाने पुढे मांडत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (विशेषांक २००५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...