आम्हीच खरे
ब्राह्मण्यविरोधक! (भाग 3)
दाभोलकर, सिंहस्थमेळा, यज्ञविरोध
६) वैदिक
ब्राह्मणी धर्माचे सर्वांत महत्त्वाचे कर्मकांड म्हणजे यज्ञ. यज्ञसंस्कृती
महाराष्ट्रात पुनरूज्जीवित करण्याचा आणि वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे.
याचाच एक भाग म्हणून गंगाखेड, जि. परभणी येथे पूर्ण वर्षभर चालणाऱ्या
एका यज्ञाचा प्रारंभ झाला. त्याला विरोध केला तो फक्त महाराष्ट्र अंधश्रद्धा
निर्मूलन समितीने. त्यासाठी जी यज्ञविरोधी परिषद घेतली गेली, त्याला डॉ. श्रीराम लागू, डॉ. आ. ह. साळुंखे अशा ज्येष्ठ व्यक्ती आवर्जून आल्या होत्या.
गावातील विरोध पत्करून परिषद यशस्वी करण्यात आली. डॉ. आ. ह. साळुंखे सरांची
यज्ञविषयक एक छोटी पुस्तिकाही छापून वितरीत करण्यात आली. सातारा येथे श्रीराम महायज्ञ झाला. त्या यज्ञाविरोधातही
समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केले, धरणे धरले; तसेच स्वत:ला अटकही करवून घेतली. जेथे जेथे वाजत-गाजत यज्ञ हे
कर्मकांड केले जाते, तेथे तेथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधन
आणि संघर्ष या मार्गाने शक्यतो सर्व विरोध करतात.
७) सिंहस्थ
मेळा हा दर बारा वर्षांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे भरतो. या मेळ्याबद्दल संत
तुकारामांच्या पुढील ओळी प्रसिद्ध आहेत-
आली आली पर्वणी, न्हाव्या-भटा झाली धनी।
वरवर बोडी डोई दाढी, अंतरी पापाच्या कोडी।।
पर्वणी आली की, भटांना फायद्याची पर्वणी निर्माण होते, हा भाग यावरून स्पष्ट होतो. बारा वर्षांनंतर येणाऱ्या
पर्वणीच्या मुहुर्तावर अंघोळ करण्यासाठी भाविकांची महाप्रचंड झुंबड उडते. या
पर्वणीच्या मुहुर्तासाठी देशभरातून साधूंचे हजारो तांडे येतात. एकूण व्यवस्थेचा
खर्च मागील वर्षी आलेल्या पर्वणीच्या वेळी ४४८ कोटी रुपये झाला. शासनाकडून असा
दावा केला जातो की, मोठ्या संख्येने भाविक येतात; मग त्यांच्या सुविधांसाठी आणि त्यातून कायम स्वरुपाचा विकास
करण्यासाठी हे पैसे खर्च केले तर कोठे बिघडले? समितीचे मत कोणत्याही
मुहुर्तावर पापक्षालनार्थ अंघोळ करणे याविरोधातच आहे. मात्र कोणाला त्याची गरज
वाटत असेल तर त्याला देशाच्या घटनेने तो अधिकार दिला आहे. मात्र नागरिकांच्या
करातून जमा होणारी रक्कम या
मंडळींच्या सुख-सोयीसाठी वापरण्याऐवजी दुर्लक्षित अशा शिक्षण अथवा आरोग्य या
कामावर वापरली जावयास हवी. त्याबरोबरच
असे सिंहस्थ मेळे, तेथील सर्व वातावरण हे अंधश्रद्धेला
कमालीचे खतपाणी घालणारे असते, असे समितीचे मत आहे. १९९१ मध्ये सिंहस्थ
मेळा झाला, त्यावेळी समितीची नुकतीच स्थापना झाली
होती. तरीही त्या विरोधात समिती बोलली. २००३ साली सिंहस्थ मेळ्याला विरोध केलेली
महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. नाशिक
येथे समविचारी संघटनांची समिती निर्माण करून याबाबत विरोध नोंदवण्याचा प्रयत्न
झाला. तो फारसा यशस्वी झाला नाही. तरी न डगमगता ‘एकला चलो रे’ म्हणत समितीने आपला संघर्ष चालूच ठेवला. या विषयावर पुस्तिका
काढली आणि नाशिक येथेच तिचे प्रकाशन केले. सिंहस्थाच्या मेळ्याबाबत संत
तुकारामांचे मत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘सिंहस्थ’ ही कविता यांची बहुरंगी मोठी सुरेख पाच हजार पोस्टर्स छापून
ती महाराष्ट्रभर वितरीत केली. सिंहस्थ मेळाव्याचा उदो-उदो करण्यात सर्व
प्रसारमाध्यमे धन्यता मानत असताना त्याबाबत दुसरी बाजू नाशिक येथे स्थानिक केबलवरील, आकाशवाणीवरील मुलाखतीच्याद्वारे मांडण्यात आली. या स्वरुपाचे
कार्य अन्य कोणत्याही संघटनेने केले नाही.
८) पिंडदानासारखे
कार्य करून घेणे हे देखील भिक्षुकी पेशाचे पोटभरू कारस्थान आहे. त्यावर अनेकांनी
अनेक प्रकारे लिहिलेले आहे आणि समितीच्या लिखाणातही याबाबत
प्रबोधन केलेले आहे. मात्र यापुढे जाऊन समितीच्या एका शाखेने सहा फुटाची माणसाची प्रतिकृती असलेली बाहुली गावच्या
चौकात टांगली आणि दहाव्या दिवशी तिचे पिंडदान केले; तर दुसऱ्या एका
कार्यकर्त्याने स्वत:च्या वाढदिवसादिवशी स्वत:ची पत्नी व मुले यांच्या समोर
स्वत:चा पिंड ठेवला. आता कावळ्यांच्याद्वारे मृत व्यक्तींचा आत्मा येत असेल, तर या दोन्ही पिंडांच्याकडे कावळ्याने खरे तर फिरावयास नको
होते. परंतु चवदार खाण्याला चटावलेले कावळे. त्यांच्या लेखी पिंड ठेवलेला माणूस हा
जिवंत आहे का मृत, याला काय किंमत? त्याने पिंडाचा फडशा पाडलाच. हा कार्यक्रम काहीसा भडक वाटू शकेल; परंतु लोकांच्या अत्यंत हास्यास्पद रूढी, चुकीच्या धार्मिक कल्पनांना धक्के देण्याचे प्रचंड सामर्थ्य
त्यात आहे. त्यामुळे पुढे एका ठिकाणी असा कार्यक्रम जाहीर करताच स्वत:ला धर्मसंरक्षक म्हणवणाऱ्यांनी त्या विरोधात
कोल्हेकुई केली. यावरूनच ब्राह्मण कर्मकांडांना धक्का देणाऱ्या या उपक्रमाची ताकद
दिसून येते.
९) समिती
ब्राह्मण बाबा-बुवांना विरोध करत नाही, हा आरोप खरे तर हास्यास्पद
आहे. अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार आहे. हा काळाबाजार सर्व
जाती-धर्मातील लोक करतात. त्यात शोषण आहे म्हणूनच त्यास विरोध करावयाचा. हे
शोषण होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ब्राह्मण्यवादी विचार. हा विचार ब्राह्मण
जातीशीच केवळ संबंधित नाही. जन्मजात श्रेष्ठत्व, काही फायद्याच्या
व्यवस्थांचा जन्मजात अधिकार, कर्मविपाकाचा सिद्धांत, प्रारब्ध, नियती यांची कल्पना, अशा अनेक बाबींचा समावेश ब्राह्मण्यात होतो. कोणत्याही धर्माचा
अथवा जातीचा म्हणून समितीने कोणत्याही बाबा, बुवाला कधी विरोध
केला नाही. विरोध केला तो त्याच्या अशास्त्रीय मांडणीला, शोषणाच्या पद्धतीला. आसाराम बापू हे सध्या चलती असलेले बडे नाव
आहे. त्यांनी ‘यौवन सुरक्षा’ नावाचे एक पुस्तक लिहिले. कामजीवनाबद्दल अत्यंत अशास्त्रीय
माहिती त्यामध्ये देण्यात आली होती. अशा माहितीमुळे तरुणांना यौवनाची सुरक्षा
राखण्यास मदत होण्याऐवजी दिशाभूल व गोंधळ होण्यासच जास्त मदत होणे स्वाभाविक. या
मांडणीचे अत्यंत सडेतोड प्रतिवाद करणारे पुस्तक या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांकडून
लिहून घेऊन समितीने ते प्रसिद्ध केले. याबद्दल समितीला धमक्या सोसाव्या लागल्या.
अनिरुद्ध बापू हे असेच आणखी एक बडे प्रस्थ. त्यांच्या विरोधात समितीने आपल्या
वार्षिक विशेषांकात एक तपशीलवार कव्हरस्टोरी प्रसिद्ध केली आणि त्यांचे सत्यस्वरूप
लोकांच्या समोर आणले. सिंहस्थ मेळ्यात पुढे-पुढे मिरवणारा आणि काशीच्या
धर्मपीठाकडून स्वत:ला धर्माचार्य ही पदवी मिळवून घेऊन त्याचा उदो-उदो करणारा
नरेंद्र महाराज हे, जन्माने ब्राह्मण नसलेल्या; पण ब्राह्मणी बुवाबाजीचे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्र महाराजांच्या विरोधात गेल्या आठ
वर्षांत समितीने जेवढे उठाव केले, त्यातील
एक देखील अन्य कोणी संघटनेने केला नाही. नरेंद्र महाराज नाणीज मठात जाऊन
त्यांच्याशी आमने-सामने चर्चा करून त्यांना चमत्कारांचे दावे सपशेल माघारी
घ्यावयास लावणे, त्यांच्या अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी पत्रके, पोस्टर्स याद्वारे
जागृती करणे, जनप्रबोधनाच्या फेऱ्या काढणे, धरणे धरणे, निदर्शन करणे या सर्व मार्गांनी नरेंद्र
महाराजांचे सत्यस्वरूप लोकांसमोर समितीने सतत मांडले आहे.
१०) ब्राह्मणी
अंधश्रद्धांचा डोलारा ज्यावर उभा असतो त्यातील एक महत्त्वाची कल्पना म्हणजे आत्मा
व परमात्मा. या कल्पनांचा वापर करून स्वत:चे साम्राज्य उभे केलेले संघटन
म्हणजे प्रजापिता ब्रह्माकुमारी पंथ. यांचे स्वरूप काय आहे, याबाबत थेट त्यांचे मुख्य कार्यालय असलेल्या माऊंट अबू येथे
जाऊन समितीच्या प्रतिनिधींनी पाहणी केली व त्याचा ‘स्पेशल रिपोर्ट’ वार्षिक विशेषांकात प्रसिद्ध केला. या स्वरुपाचे असे लिखाण
अन्य कोणत्याही संघटनेने केलेले नाही.
प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या इस्लामपूर येथील
काहीजणांना आपली फसवणूक झाली आहे, अशी जाणीव झाली. तक्रार नोंदवण्याची त्यांना
भीती वाटत होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती खंबीरपणे त्यांच्या मागे उभी राहिली.
पोलिसांत तक्रार दाखल केली गेली. प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या विरोधात गावात मोठी
जाहीर सभा झाली.
११) हिंदुत्ववादी
शक्ती बहुजनांचा चेहरा घेण्याचा प्रयत्न करतात. वर्ण, जाती विसरूया असे तोंडदेखले म्हणतात; परंतु प्रत्यक्षात त्यांच्या लेखी हिंदू धर्म म्हणजे सनातन वैदिक ब्राह्मणी धर्मच
असतो. स्वाभाविकच धर्म या कल्पनेची चिकित्सा करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांना अडचणीची वाटते.
यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात ही मंडळी गोंधळ घालतात. कधी ते
‘पतित पावन’ संघटनेचे स्वयंसेवक असतात, कधी ‘नरेंद्र महाराजांचे’ बिल्ले लावलेले शिष्य असतात. कधी ‘सनातन भारतीय संस्थेचे’ साधक असतात.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सभा उधळणे, एवढेच
त्यांचे कर्तव्य असते. कार्यक्रम सुरू असताना मध्येच
उभे राहून तावातावाने
बोलणे, घोषणाबाजी करणे, गोंधळ घालणे हे काम धर्मकर्तव्य समजून ही
मंडळी पार पाडतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सत्याग्रही बाण्याने काम करणारी संघटना आहे. यामुळे या गोंधळाने विचलित न होता
प्रतिहल्ला न करता; परंतु ठाम निर्धाराने समिती या परिस्थितीचा मुकाबला करत आपल्या सभा पार
पाडते. ही मंडळी अन्य कोणत्याही संघटनेच्या विरोधात
हा कांगावा करत नाहीत. याचे एक कारण समितीचा विवेकी विचार त्यांच्या सनातनी ब्राह्मणी विचाराच्या थेट
मुळाशी येतो, याची त्यांना कल्पना आहे. केवळ
गोंधळावरच ही मंडळी थांबत नाहीत,
तर काही वेळा प्रत्यक्ष मारहाण करण्यापर्यंत
यांची पाळी जाते. डॉ. श्रीराम लागू व नरेंद्र
दाभोलकर यांच्या औरंगाबाद येथील ‘विवेकजागराचा वाद-संवाद’ या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. लागूंना धक्काबुक्की झाली, तर दाभोलकरांच्यावर थेट हल्लाच झाला. पुणे येथे नरेंद्र
महाराजांच्या विरोधात प्रबोधनाची पत्रके चिकटवणाऱ्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना
रस्त्यावरून हिंदी सिनेमा स्टाईलने पळवून नेण्यात आले आणि अंगावरचे कपडे काढून
बेदम मारण्यात आले. तीन तासांनी योगायोगाने
पोलिसांना ठावठिकाणा लागला म्हणून कार्यकर्ते वाचले. सगळ्यात घृणास्पद बाब म्हणजे
नरेंद्र महाराजांच्या ज्या भक्तांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांचा सत्कार ‘धर्मवीर’ म्हणून नरेंद्र महाराजांनी केला. ‘सनातन भारतीय संस्कृती’चे ‘सनातन प्रभात’
हे तर अंधश्रद्धा
निर्मूलन समितीबाबत अत्यंत विद्वेषी व हिंसक पद्धतीने प्रचार करत असते. ‘अधर्माने वागणाऱ्या राजाला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे
मारण्याची धर्मशास्त्रातील शिक्षा काळानुसार धर्मद्रोही ‘अंनिस’लाही असेल’ असे ठळक मथळ्यात छापत ‘सतत धर्मविरोधी कृत्य
करून धर्माचा ऱ्हास घडवणाऱ्या ‘अंनिस’लाही एक दिवस ईश्वरी नियोजनाने या शिक्षेला
सामोरे जावे लागेल’ अशी धमकी नेहमीच दिलेली असते. सनातनी
ब्राह्मणी प्रवृत्तीविरुद्ध प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या कामाची किंमत ‘अंनिस’ आनंदाने द्यायला तयार आहे.
१२) याबरोबरच
आणखी एक हत्यार अलिकडे सनातनी भारतीय संस्थेने वापरावयास
सुरुवात केली आहे. उत्तम
प्रकारे
शिकल्या-सवरलेल्या स्वत:च्या मुली या सनातन भारतीय
संस्थेकडे गेल्या आणि त्यांनी स्वत:च्या आईवडिलांना नाकारले. याचा प्रचंड धक्का
बसलेल्या काही पालकांनी समितीकडे याबाबतची तक्रार दिली. त्यांचे म्हणणे असे की, देवाधर्माची साधना असे म्हणत आमच्या
मुलींचे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्यात आले. हे त्यांचे निवेदन ‘अंनिस’च्या वार्तापत्रात
छापण्यात आले आणि वृत्तपत्रांनाही पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले. याबद्दल
संबंधित पालकांच्या बरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संघटना व वार्तापत्र
यांच्यावर एक कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची फिर्याद सनातन भारतीय संस्थेने दाखल
केली आहे.
वरील सर्व बाबी यासाठीच मांडल्या आहेत
की, ब्राह्मणी हितसंबंध ज्या व्यवस्थेकडून
जोपासले जातात आणि त्यामुळे अंधश्रद्धा व शोषण वाढीस लागते, त्या विरोधात प्रत्यक्ष मैदानात राहून विरोध करणारी ‘अंनिस’सारखी दुसरी संघटना नाही. जात ही या देशातील एक निखालस अंधश्रद्धा
आहे. एकजण इतका पवित्र की, त्याच्या
पायाचे पाणी घेतले तर तीर्थ होते आणि दुसरा इतका अपवित्र की त्याच्या सावलीचा
विटाळ होतो. ही कल्पना फक्त अंधश्रद्धाच असू शकते. परंतु जातिव्यवस्था ही यापेक्षाही अधिक
गंभीर बाब आहे. कारण ती एक क्रूर शोषणव्यवस्था आहे. समिती सर्व पातळीवर
जातिव्यवस्थेला विरोध करू इच्छिते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिप्रथा
निर्मूलनाची त्रिसूत्री सांगितली होती. त्यातील एक सूत्र होते आंतरजातीय विवाह, दुसरे होते धर्मग्रंथांची चिकित्सा आणि तिसरे होते शोषित
जातींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. यापैकी पहिल्या
दोन कार्यक्रमांत समिती थेटच सहभागी असते. समितीचे केंद्र हे आंतरजातीय विवाह
करणाऱ्यांना आधारस्थळ वाटते. समितीतर्फे एक जानेवारी हा नववर्ष दिन ‘आंतरजातीय विवाह स्वागत दिन’ म्हणून पाळला जातो. आंतरजातीय
विवाह केलेल्या जोडप्यांना आवर्जून पाचारण करून त्यांचा सत्कार केला जातो. त्यांचे
अनुभव इतरांना ऐकवले जातात. धर्मग्रंथातील कालबाह्य कर्मकांडे, व्रतवैकल्ये यांची चिकित्सा समिती नेहमीच करते. ज्यांना केवळ
जातीमुळे शिक्षणाचा अधिकार आणि मालमत्ता धारण करणे याला नकार मिळाला, त्यांच्यासाठी राखीव जागा आणि शेती व अन्य राष्ट्रीय मालमत्तेत
नाकारलेला वाटा देणे, ही न्यायोचित व आवश्यक बाब आहे, असे समितीला वाटते. यामुळे समिती जातिव्यवस्था केवळ अंधश्रद्धा
म्हणून नाकारत नाही, तर अमानवी शोषण करणारी या देशातील एक
दुष्ट व्यवस्था म्हणून नष्ट करू इच्छिते. समितीचे हे विचार आणि त्याप्रमाणे घडणारा
आचार हे एवढे स्पष्ट असताना समिती ब्राह्मणी कर्मकांडांना, बाबा-बुवांना,
विचारप्रणालींना
विरोध करत नाही हा आक्षेप खरे तर क्षणभरही टिकणार नाही. जे असा आरोप करतात त्यांना
हे सर्व माहीत नाही, असे कसे मानावे? काही वेळा ही मंडळी कोणत्यातरी घटनेकडे, बाबा-बुवाकडे बोट दाखवून असे म्हणतात, ‘आता बोला, या विरोधात का नाही लढलात?’ ही गोष्ट खरीच असते की, त्या विशिष्ट बाबतीत
संघटनेने संघर्ष केलेला नसतो. स्वयंसेवी पद्धतीने घरचे खाऊन सर्व प्रतिकूल
परिस्थिती अंगावर घेऊन झुंजणाऱ्या कार्यकर्त्यांना असे प्रत्येक क्षणी धावून जाणे
इच्छा असली तरीही शक्य नसते आणि प्रश्नाचे व्यापकत्व पाहता ते कधी शक्य होणारही
नाही. परंतु तिरकसपणे असा प्रश्न विचारणाऱ्यांना आम्ही नम्रपणे एवढेच सांगतो, ‘बाबांनो, आमची ताकद पणाला लावून लढत आहोत, तरीही कमी पडत आहोत. तुम्ही मदतीला या. ते शक्य नसेल तर
स्वतंत्रपणे थेटपणे कामाला भिडा. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीला खरा रस आहे,
अंधश्रद्धेच्या नावाने निर्माण करण्यात येणाऱ्या माणसांच्या मानसिक गुलामगिरीचा
मुकाबला करण्यात.’ यासाठी जेवढे हात उभारले जातील, त्या सर्वांच्या हातात आपला हात देण्यास समिती उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा