विरोध
आणि सहकार्य
दाभोलकर, फलज्योतिष, चळवळ, आर्थिक मदत
‘लोकसत्ते’तून फलज्योतिषावरचा वाद मुंबईत चांगलाच रंगला.
दोन्ही बाजू अहमहमिकेने नेहमीप्रमाणे एकमेकांवर तुटून पडल्या. वृत्तपत्राने काही दिवसांनी
त्यांच्यापुरता वाद थांबविला. पण आपल्या कार्यकर्त्यांनी मात्र या वातावरणाचा फायदा
उचलावयाचे ठरवले आणि फलज्योतिषावर दोन दिवसांचे विचारमंथन जाहीरपणे ठेवले.
दादर सार्वजनिक वाचनालयाने आनंदाने सहकार्य दिले. कल्पना होती,
एकदा आमने-सामने सवाल-
जवाब झडायलाच हवेत! पण आश्चर्य म्हणजे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांपासून ते महाराष्ट्र
ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. श्री. भटांपर्यंत सगळ्यांनी या ना त्या कारणाने लढतीला
येण्याचे टाळले. अधिकृत प्रतिनिधीही ते देऊ शकले नाहीत. वेळ सोयीची नाही, हे पेटंट कारण होतेच. परिसंवाद, व्याख्याने छान झाली. दोन्ही दिवशी तुडुंब
गर्दी होती. दुसऱ्या दिवशी तर अक्षरश: जागाच नव्हती. प्रकाश घाटपांडे आणि मा. श्री.
रिसबूड या दोघांनीही फलज्योतिषाच्या आधारातीलच अंतर्विसंगती चांगल्या प्रकारे दाखवून
दिली. आश्चर्य म्हणजे बहुसंख्य श्रोतृवर्ग आपल्या विचारांशी मिळता-जुळता होता. त्यामुळे
येणारे तिरके प्रश्न हे ज्योतिष हे शास्त्र आहे म्हणवणाऱ्यांना होते. फलज्योतिषाला
शास्त्राच्या पंक्तीत बसवावयास निघालेले (भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर) निवृत्त शास्त्रज्ञ
डॉ. जोशी यांची त्या प्रश्नांनी चांगलीच पंचाईत केली. आपल्या विचाराचेच जास्त लोक व्याख्यानाला
आले होते का, मध्यमवर्गीयातील
एक छोटा प्रवाह आपल्याला अनुकूल होत आहे, याचा माझ्या मनाला काहीसा प्रश्न पडला. नेहमीच्यापेक्षा वेगळी मांडणी
मी अभ्यासपूर्वक करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांना तो रूचल्याचे जाणवले.
पुण्यातील एका धनवंत जैन भगिनींच्या घरी गेलो होतो. धर्माच्या नावाने
पैशाची होणारी अनाठायी उधळपट्टी याविरुद्ध त्या सतत आवाज उठवितात. समाजाच्या सामाजिक
प्रश्नाकडे पोटतिडकीने लक्ष वेधतात. सांगलीला सप्टेंबर महिन्यात असाच एक मोठा यज्ञ
होणार आहे. पंधरा-वीस लाखंचा चुराडा. त्या विरूद्ध काय करता येईल, याची चर्चा झाली. सांगलीचा डॉ. प्रदीप पाटील
बरोबर होताच. सांगलीची अंनिस यात पुढाकार घेईल. तुमचा सहभाग काय व कसा राहील,
असे मी विचारले. चळवळीसाठी
पूर्ण आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली गेली. पण उघड संलग्नता नको, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. वृत्तपत्रे
निवेदन, चळवळ
यामधील सहकार्यासही नकार मिळाला. ‘आमचे आम्ही एकटे करतो म्हणून समाज नाराज असला तरी खपवून घेतो. उद्या
अंनिससारख्या बाहेरच्यांशी हातमिळवणी केली. पेपरला गेलो, तर बहिष्कारच पडेल,’ असे सांगण्यात आले. चुकीच्या रूढी,
परंपरा, कर्मकांडे मोडण्याचे काम किती अवघड आहे,
हे पुन्हा एकदा लख्खकन्
माझ्या डोळ्यांसमोर चमकून गेले.
बोहरा समाजातले ताहेर पुनावाला असोत, नाहीतर जैन समाजातील हे व्यापारी, दोघेही पुण्यासारख्या सुधारक शहरातले. आर्थिकदृष्ट्या
अतिशय मजबूत. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा त्यांचा व्यापारी समाज आणि तरीही त्यांना
द्यावी लागणारी पूर्णत: एकाकी लढत, समाजाचा
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बहिष्कार. खरंच! ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई किती अवघड आहे?
परंतु तरीही आपण ती लढत आहोत. कारण सहकार्याचे,
मदतीचे अनेक हात आपोआप
पुढे येत आहेत.
अनेक प्रकारचा दुसराही प्रतिसाद मिळत आहे. आपल्या आर्डे सरांनी कोल्हापूरच्या ‘पुढारी’
दैनिकात लेख लिहिला, तर
तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत:हून त्यांना बोलावून घेतले. तालुक्यातील ग्रामसेवक
आणि शिक्षक एकत्र करतो, त्यांच्या
पुढे बोला, असा प्रस्ताव ठेवला. टेंभुर्णी
(जि. सोलापूर) येथे शाखा नुकतीच स्थापन झालेली. पण त्यांनी पंधरा ऑगस्टला बुवाबाजीवरील
व्याख्यानाबरोबर रक्तदानासारखा महत्त्वाचा उपक्रमही पार पडला. त्यांची प्रशिक्षण शिबिरार्थी
नोंदणीही दोनशेच्या घरात पोचली आहे. नेवासा (जि. नगर) जवळच्या ज्ञानेश्वर सहकारी साखर
कारखान्यावर त्यांनी व्याख्यानाला दोघांचा प्रवासखर्च सोडून हजार रुपये चळवळीसाठी
(मानधनरूपाने) दिले. शिवाय शाखा निघेल ते वेगळेच. ‘मातृमंदिर, देवरूख’सारखी कोकणातील मातब्बर संस्था कोकण
विभागातच शिबीर घेऊ मागते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘युवा एल्गार’ या आपल्या चळवळीचे सल्लागारपद स्वीकारायला युवक खात्याचा स्वतंत्र
भार सांभाळणाऱ्या नामदार शामराव आष्टेकरांनी आणि सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकरांनी
आवर्जून लगेच मान्यता दिली. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन.
भारतातील ही सर्वांत मोठी शिक्षणसंस्था. एन. डीं.नी साताऱ्याला सर्व स्थानिक प्राचार्य,
मुख्याध्यापकांची बैठक घेऊन, आपल्या
चळवळीच्या विचाराला अनुकूल असे प्राध्यापक, शिक्षकांचे मानस घडविण्यावर भर दिला.
जगूबाबा गोरड याच्यामुळे तर चळवळीचा नवीनच एक परिणाम पुढे आला आहे.
जगूबाबा हा सातारा, सांगली
भागातला नावाजलेला देवऋषी. काही कारणाने तो आटपाडी शाखेच्या आर. एस. कुलकर्णींच्या
सान्निध्यात आला. त्याने धंदा आधीच बंद केला होता; पण कुलकर्णींनी त्याला चळवळीचा स्पर्श दिला.
ग्रामीण भागात त्याचे ‘अनुभवकथन’ घेतले. प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली, सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी कार्यक्रम
झाले. चळवळीला जगूबाबाचा उपयोग होतो, यात शंकाच नाही. त्याचे पनवेल, डोंबिवली, अलिबाग, दादरचे कार्यक्रमही चोखंदळ श्रोतृवर्गापुढे
गाजले. पण त्याच्या पोटा-पाण्याचे काय? मुलाबाळांचे काय? हा प्रश्न होताच. मंडपेसरांनी खटाटोप करून त्याची दोन मुले बालसुधारगृहाध्ये
दाखल केली. दहा एक हजार रुपये मिळाले असते तर शेतीला पाणी देणे शक्य होते. पण आणायचे
कुठून? मी सरळ मुख्यमंत्र्यांनाच
पत्र लिहिले. चंबळच्या दरोडेखोरांचे पुनर्वसन होते; मग फुले स्मृतिशताब्दी वर्षात धंद्यातून
बाहेर येऊन चळवळीत सामील होणाऱ्या जगूबाबाचे का होऊ नये? तेव्हा मुख्यमंत्री निधीतून दहा हजार रुपये
पाठवावेत आणि आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री निधीचा चेक आलादेखील. सातारच्या पोलीस उपअधीक्षकांच्या
हस्ते तो समारंभपूर्वक जगूबाबाला देण्यात आला. बारामतीच्या शाखेचे आपले कार्याध्यक्ष
विजयराव मोरे प्रमुख पाहुणे होते.
थोडक्यात काय, विरोध
आणि सहकार्य या दोन्ही काठांच्या मधूनच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रवाह पुढे सरकणार,
हे दिसत आहेच. परंतु प्रवाह जिता,
जागता, गतिमान ठेवणे हे आपले सर्वांचे काम. म्हणजे
चळवळ आपोआप पुढे जाणारच.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा