सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

समितीची भूमिका

समितीची भूमिका

दाभोलकर, भूमिका, जनसंवाद, पशुहत्या, चळवळ
अलिकडेच जळगावला गेलो होतो. सुप्रसिद्ध उद्योगपती भंवरलालजी जैन यांची भेट घेतली. झाले होते ते असे, काही महिन्यांपूर्वी माझा व डॉ. श्रीराम लागूंचा विवेक जागराचा वादसंवाद कार्यक्रम जळगावला झाला होता. त्याचा वृत्तांत भंवरलालजींच्या कानावर गेला होता. देव आणि धर्म याबाबतच्या आपल्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात काही प्रश्नचिन्हे होती. त्याबद्दल बोलणे हे भेटीचे एक प्रयोजन होते. वेळेला पैशाची किंमत असते, हे तर खरेच. उद्योगपतींच्या बाबतीत हे अधिकच खरे आहे; परंतु त्यांनी पुरेसा वेळ दिला. आस्थेवाईकपणे आपली भूमिका समजून घेतली. स्वत:च्या मनातील शंका दूर झाल्याची मनमोकळी कबुली दिली. मला वाटते, हे प्रातिनिधिक ठरावे. लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व देव आणि धर्म यांची स्वत: घातलेली सांगड असते. त्यामुळे समितीची भूमिका समजावून घेण्याऐवजी स्वत:च्या मनातील आक्षेप, हीच समितीची भूमिका असा चुकीचा ग्रह करून घेतला जातो. आपले कार्यकर्तेही हा गैरसमज दूर करण्याचे प्रभावी प्रयत्न करताना दिसत नाहीत. हा आळस आहे, की समितीची भूमिका स्वत:लाच नीट समजलेली नाही, का इतरांना भूमिका पटवून देण्याचे कौशल्य कमी पडते. कारण काहीही असो, या विषयावर प्रभावी जनसंवाद वाढवणे आता गरजेचे झाले आहे.

सोलापूर शाखेने स्वत:च्या कामाचा काढलेला अहवाल नुकताच बघितला. अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी, मागील वर्षांतील कार्य, लोकांच्याकडून अपेक्षा या सर्व बाबी त्यांनी नेमकेपणाने नोंदवल्या आहेतच; पण मला विशेष कौतुक वाटले ते याचे की, त्यांनी वर्षभराचा जमा-खर्च अहवालासोबत छापला आहे. लोकांच्या प्रत्येक पैशाला आपण जबाबदार असतो आणि कामाच्या अहवालाबरोबरच पैशाचा अहवालही चोखपणाने द्यावयास हवा, ही जाण आपल्या सर्व शाखा जितक्या लवकर दाखवतील तेवढे चांगले, असे मला आवर्जून वाटते.

डॉ. लागू यांच्याबरोबर बेळगाव, सिंधुदुर्ग व गोवा असा दौरा झाला. विवेक जागराचे कार्यक्रम चांगले झाले. तरुण भारत हे बेळगावचे दैनिक या सर्व भागात सर्वाधिक खपाचे आहे. त्यांनी सतत उत्तम प्रसिद्धी दिली. बेळगावच्या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी होती. सावंतवाडीची वेळ दुपारची असूनही प्रतिसाद चांगला होता. खंत वाटते ती ही की, याचे पुढे संघटना बांधणीत प्रतिबिंब उमटत नाही. प्रयत्न करूनही सावंतवाडीला आपली शाखा निघू शकलेली नाही. बेळगावच्या कार्यक्रमानंतर तेथील पूर्णवेळ कार्यकर्ते श्री. नारायण आतिवाडकर यांचे पत्र आले, ‘कार्यक्रमामुळे प्रत्यक्षात कार्यासाठी येणाऱ्यांचा ओघ वाढेल असे वाटले होते; तेच मात्र घडले नाही. हा अनुभव तसा नवीन नाही. माझ्या आणि चळवळीतील इतर अनेकांच्या सभांना जी गर्दी जमते, ती प्रत्यक्ष कामात परावर्तीत होत नाही. काही प्रमाणात असे होणारच. परंतु संघटनात्मक आकलनात व संयोजनात काही त्रुटी राहिल्यामुळे असे होते का, याचा शोध अंतर्मुख होऊ घ्यावयास हवा.

एका जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक घेतली. विषय आपापसातील राजी-नाराजीचे. अशा बैठकीत शेवटी साधारणपणे झाले गेले विसरून एकत्रितपणे काम करण्याची भाषा होते, काहीशी सक्तीच्या खुशीने. संघटना चालवायची तर मानवी स्वभावाला धरून या तडजोडी होणारच. पण या बैठकीत एक नवीनच मुद्दा पुढे आला. तो असा की, समजा एकमेकांचे स्वभाव आपापसात जमवून घेण्यासाठी पूर्णपणे विसंवादीच असतील तर...? असे असल्यास उगीच जुळवाजुळवी करण्यात काय अर्थ? मला स्वत:ला हा मुद्दा पटला नाही. काहीसा क्लेशदायकही वाटला. आपण एक विवेकी चळवळ चालवतो. सर्व जगाशी मूल्याधिष्ठित सुसंवादित्व हा विवेकाचा पाया आणि कालपर्यंत ज्यांच्याबरोबर काम केले, त्यांच्याशी एकदम पूर्ण विसंवादित्व निर्माण होणे, यात आपलेच काही चुकत नसेल का? विशेषत: ध्येय, संघटना, कार्यक्रम एकच असताना असे घडत असेल तर आपण अंधश्रद्धा निर्मूलन ते काय करणार; मग विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती तर दूरच राहिली. याहीपेक्षा वेगळा पेच एका कार्यकर्त्याने सांगितला. कामाच्या आकर्षणाने एक व्यक्ती समितीची सभासद बनली. उत्साहाने चळवळीत आली. देवधर्म मुळातच मानत नसल्याने व वैज्ञानिक जाणिवा आत्मसात केल्या असल्याने बाकीचा प्रश्न नव्हताच. ती व्यक्ती ज्या ठिकाणी नोकरीस होती, तेथील शिरस्त्याप्रमाणे तिला वरकमाई चांगली होती आणि ती घेताना तिच्या मनाला कोणतीही बोचणी नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व नोकरीचा व्यवहार दोन्ही आपण आपल्या ठिकाणी चोख सांभाळतो, असे तिला वाटत होते. मला मात्र ही आत्मवंचना वाटते, विवेकवादी जीवनमूल्यांशी केलेली.

उस्मानाबाद जिल्ह्यात दीडशे कार्यकर्त्यांचे एक दिवसाचे शिबीर उत्तम झाले. तेथे कलापथक बसवूनही काम सुरू आहे.

चाळीसगाव जवळच्या बंजारा समाजाच्या एकेका तांड्यावर नवरात्रीला सुमारे ४०० ते ५०० बोकडे नवसापोटी मारली जातात. अशा तांड्यांची संख्या ४० आहे. इंदर चव्हाण हा तेथील आपला तडफदार कार्यकर्ता नागेश सामंत यांच्याबरोबर काम करतो. प्रबोधनाने दोन वर्षांपूर्वी दोन तांड्यांवरील पशुहत्या त्यांनी पूर्ण थांबवली. यंदा सर्व तांड्यांवर हे करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. २५ सप्टेंबरला खानदेश विभागाची यात्रा पशुहत्याबंदी कृती परिषद चाळीसगावला होईल आणि नवरात्रीपर्यंत निकराचे प्रयत्न केले जातील.

गोव्यातील कार्यक्रम चांगले झाले. जुलै महिन्यात तेथे शिबीर होईल व संघटनात्मक कामकाज बहुधा सुरू होईल. कर्नाटकातून कन्नड भाषकांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षा घेण्याची मागणी आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९४)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...