‘अंनिस’ची
उपक्रमशीलता : पर्यावरणीय होळी
दाभोलकर, पर्यावरण, दुर्गुणाची होळी, कायदा, उपक्रम, संकल्पपत्र,
सर्पयात्रा, परिपत्रक, चमत्कार प्रशिक्षण शिबिर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सामाजिक कार्याच्या क्षेत्रात
एक राज्यव्यापी मान्यता आहे. ही मान्यता कशामुळे आहे, याबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु एका बाबतीत एकमत आहे. ती बाब अशी
की, महाराष्ट्र अंनिसला सतत उचित प्रसिद्धी लाभत
आली आहे आणि या उचित प्रसिद्धीचे खरे मर्म आहे, संघटनेच्या उपक्रमशीलतेत. महाराष्ट्र अंनिसने गेल्या २० वर्षांत
अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले. ‘शोध भुताचा,
बोध मनाचा’ यात्रेपासून ते महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या सर्व यात्रेपर्यंत.
त्याची श्रेयनामावली सांगता येईल. या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांना काम मिळते, उत्साह वाढतो, मरगळ झटकली जाते. लोकांच्यासमोर समितीचे
कार्य येते. उपक्रम
नाविन्यपूर्ण असेल तर
प्रसारमाध्यमे उत्तम प्रकारे
दखल घेतात. यासाठी अनेक उदाहरणे देता येणे शक्य आहे. परंतु आजच्या लेखाच्या पुरतेच एक उदाहरण
मांडत आहे.
२७ जानेवारीला औरंगाबादहून सर्पयात्रा निघाली. ती जालना, बीड, लातूर या मार्गाने पुढे गेली. संयोजनाच्या
मर्यादेत उस्मानाबाद जिल्हा वगळला होता. या जिल्ह्यातील ‘अंनिस’चे कामकाज संघटनात्मकदृष्ट्या
क्षीण झाले आहे, हे देखील एक कारण होते. मात्र एक वेगळीच
गोष्ट घडली. लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे असूनही (पूर्वी ते एकच होते.) त्यांचे
संयुक्त वनखाते आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी विचार केला की, आपण केवळ लातूरमध्येच यात्रेच्या निमित्ताने वातावरणनिर्मिती करून
चालणार नाही. आपण ती उस्मानाबाद जिल्ह्यातही करावयास हवी. आता या वातावरणनिर्मितीचा
प्रमुख घटक म्हणजे शाळाशाळांच्यात सर्पाच्या प्रात्यक्षिकांसह व्याख्याने आयोजित करणे.
त्यासाठी सहकार्य हवे. जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उस्मानाबाद अंनिसशी
संपर्क साधला. ‘अंनिस’ची जिल्हा संघटना निद्रावस्थेत होती. कारण त्यांच्याकडे यात्रा
येणारच नव्हती. परंतु ही संधी मिळत आहे, असे लक्षात येताच ती साधण्याचा
निर्णय जिल्हा संघटनेने घेतला. जिल्ह्यात पुरेसे सर्पमित्र नव्हते. ती उणीव सोलापूरचा
सर्पमित्र व ‘अंनिस’चा कार्यकर्ता भरत छेडा यांनी भरून काढली. यामुळे जिल्ह्यातील शाळांत
सुमारे २७ कार्यक्रम झाले. वातावरणनिर्मिती झाली. उत्साह वाढला; या श्रेयाचे धनी अर्थातच स्वत:च्या पुढाकाराने ही योजना उस्मानाबाद
जिल्ह्यात राबवणारे सर्पमित्र आणि अर्थातच ऐनवेळी कामाला लागलेले उस्मानाबाद अंनिसचे
सहकारी उपक्रम अंगावर आल्यावर काय घडेल, याचे गमतीदार वर्णन उस्मानाबादचे कार्यकर्ते देविदास वडगावकर यांनी
केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘अजगरासारखी सुस्त पडलेली संघटना सर्पदंश
होताच खडबडून जागी व कृतिप्रवण झाली.’
हाच मुद्दा मला पुढे होळीसंदर्भात सांगावयाचा आहे. पर्यावरणीय होळी
ही कल्पना समितीने १० वर्षांपूर्वी चालू केली. आता तर हा उपक्रम सामाजिक वनीकरणाने आपला केला आहे. होळी प्रथेत
कालोचित बदल करावेत व रंगपंचमी पर्यावरणसुसंगत रंगाने खेळावी, असे आवाहन महाराष्ट्रातील साडेआठ हजार शाळांतील हरित सेनेला मागील
वर्षी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र अंनिसतर्फे संयुक्तपणे करण्यात आले. त्याला प्रतिसाद
चांगला मिळाला. अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्ह्यातील प्रमुख आणि महाराष्ट्र
अंनिसची स्थानिक शाखा यांनी संयुक्त उपक्रमाचे आयोजन केले. यावर्षीही तसे करावयाचे
आहे. यासंदर्भात सामाजिक वनीकरण विभागाचे परिपत्रक निघेल. त्याची प्रत जिल्हा कार्याध्यक्षांना
पाठवली जाईल अथवा मध्यवर्ती कार्यालयाला फोन करून ती मागवून घ्यावी. तसेच जिल्ह्यातील
सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांचे नाव व फोन नंबरही कार्यक्रम इच्छुक शाखांना कळवण्यात येईल. (अर्थात,
हा संपर्क जिल्ह्यातही सहजपणे उपलब्ध होऊ शकेल.) मात्र कोणत्याही कारणाने असे संयुक्त
सहकार्य होऊ शकले नाही, तरीही शक्य त्या शाखांनी अभिनव होळीचा कार्यक्रम जरूर घ्यावा. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
-
परिपत्रक
नमुना
पर्यावरणसुसंगत
होळी व ‘खेलो होली, इको फ्रेंड्ली!’
होळीचा सण व रंगपंचमी ही पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी होण्यासाठी
खालील स्वरुपाचे उपक्रमातील शक्य असेल ते नियोजन केले जावे.
१.शाळेतील विद्यार्थ्यांनी होळी शक्यतो न करणे, केल्यासच धार्मिक कारणापुरती छोटी करणे; तसेच त्यासोबतच्या अनिष्ट प्रथा (बोंब मारणे, शिव्या देणे) बंद करणे याचे आवाहन करावे. असेच आवाहन वृत्तपत्राद्वारे
लोकांना करणे.
२. होळीला पुढील प्रकारे सामुदायिक पर्याय सुचवता येतील.
अ) शाळेच्या आसपासचा नागरी परिसर व शाळा स्वच्छ करण्यासाठी अर्धा
तास श्रमदान करावे. कोरड्या कचऱ्याची होळी करावी. पर्यावरणपूरक घोषणा द्याव्यात. होळीतील
शिव्या या बहुधा स्त्रियांना कमीपणा असणाऱ्या असतात. याउलट ८ मार्चला आंतरराष्ट्रीय
महिला दिन येतो. १० मार्चला सावित्रीबाई फुले स्मृतिदिन असतो. हे लक्षात घेता स्त्री
सन्मानाच्या घोषणा होळीच्या वेळी द्याव्यात. हा कार्यक्रम म्हणूनही स्वतंत्रपणे घेता येईल.
ब) शाळेत/सार्वजनिक ठिकाणी दुर्गुणांचा एक पुतळा तयार करावा. त्या
पुतळ्याच्या विविध भागाला भ्रष्टाचार, कॉपी, दहशतवाद अशी नावे द्यावीत. हे दुर्गुण नष्ट करण्याबाबत छोटी-छोटी
तीन ते पाच मिनिटाची विद्यार्थी/शिक्षक/निमंत्रित यांची भाषणे व्हावीत व पुतळ्याचे
दहन करावे.
क) विद्यार्थ्यांसाठी खालील स्वरुपाचे संकल्पपत्र फळ्यावर लिहावे
अथवा वहीवर लिहून द्यावे. विद्यार्थ्याने स्वत:च्या व पालकांच्या विचारातून स्वत:मधील
कोणत्या दुर्गुणाची होळी करणार,
ते लिहून त्याखाली स्वत:ची
व पालकांची सही करून संकल्प पत्र शाळेत द्यावे.
संकल्प
पत्राचा नमुना
मी................................ इयत्ता.......
तुकडी......
माझ्यातील खाली लिहिलेल्या दुर्गुणाची होळी वर्षभरात
करण्याचा संकल्प करीत आहे.
संकल्प
:.......................................
विद्यार्थ्याची सही..............
पालकांची सही ................
ही संकल्प पत्रे शाळेत जमा झाल्यावर त्यात जे संकल्प स्वीकारले
गेले, त्याबाबत शक्य तर छोटे विवेचन प्रार्थनेच्यावेळी
करावे.
३. होळीच्या संदर्भात किंवा रंगपंचमीच्या संदर्भात जनजागृती करणारी
फेरी हातात घोषणा फलक घेऊन काढणे.
४. वरील कार्यक्रम हरित सेनेच्या शक्य तितक्या
अधिक शाळांत व्हावेत. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या काही शाळांत तरी निश्चित
स्वरुपात व्हावेत. एकाच दिवशी सर्व कार्यक्रम घेणे शक्य नसल्यास होळीच्या आधी दोन दिवस फेरी व त्यानंतरचे दोन
दिवस वरील स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यात यावेत.
५. वनस्पतीपासून रंग तयार करून रंगपंचमी खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना
उद्युक्त करावे. वनस्पतीपासून रंग कसे तयार करता येतात, याची माहिती शाळेत ठळकपणे फलकावर
लावावी.
वरील कार्यक्रमांपैकी ‘किमान दुर्गुणाची होळी’ हा कार्यक्रम तर घ्यावाच. तो सोयीनुसार
शाळेत वा सार्वजनिक ठिकाणी घेता येईल. एकाच शाळेत तीन वर्गातर्फे अ) कचऱ्याची होळी
ब) दुर्गुणाच्या पुतळ्याची होळी क) स्वत:मधील दुर्गुण दूर करण्याचा संकल्प करणे, हे तीनही कार्यक्रम घेणे शक्य आहे का, याचा विचार करणे.
६) होळीत पोळी टाकू नये, असे आवाहन करावे. शक्य
असल्यास त्या पोळ्या आणून देण्यासाठी एक-दोन जागा जाहीर कराव्यात व नंतर त्या पोळ्या
योग्य गरजूंना पोचवाव्यात.
७) होळीत शेणाच्या गोवऱ्या जाळू नयेत, असे आवाहन करावे. त्या गोळा करून शेतकऱ्यांना द्याव्यात. ते उत्तम दर्जाचे खत असते.
८) शाखेमार्फत (वा अन्य कोणत्याही संघटनेमार्फत) वरीलपैकी जे घडेल
त्याचा अहवाल त्वरित वार्तापत्राकडे पाठवावा.
कायद्यासाठी
स्व-रक्ताने पत्र सत्याग्रह
जादूटोणाविरोधी कायदा करण्याचा निर्धार म्हणून स्व-रक्ताने मुख्यमंत्र्यांना
पत्र लिहिण्याचा अभिनव सत्याग्रह म.अं.नि.स. करत आहे. याबाबतचा सर्व तपशील विचार
कृती पत्रिकेमार्फत प्रत्येक शाखा कार्याध्यक्ष व कार्यवाह यांना पाठवला आहे. तो त्यांनी
शाखेच्या सर्व क्रियाशील सदस्यांना दाखवावा व निर्धारपूर्वक कार्यक्रम यशस्वी करावा. महाराष्ट्रव्यापी सत्याग्रह
मंगळवार, ता. १७ मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर
सकाळी १० ते ३ या वेळेत होणार आहे. छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस येथे रेल्वेने यावे.
रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गातून रस्ता ओलांडला की, समोरच आझाद मैदानावर सत्याग्रह चालू असेल. जास्तीत जास्त संख्येने
कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे,
असे आवाहन करीत आहोत.
कोणतीही अडचण असल्यास नंदकिशोर तळाशीलकर फोन नं.९८६९१७००६२, अविनाश पाटील फोन नं. ९४२२७९०६१० वा नरेंद्र दाभोलकर ९४२३८६६५४०
यांच्याशी संपर्क साधावा.
...........................................................................
चमत्कार
प्रशिक्षण शिबीर
विज्ञानातून मनोरंजन करणारे; तसेच बुवाबाजीच्या विविध
प्रकारांचा पर्दाफाश करणारे अनेक चमत्कारांचे शास्त्रीय प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल.
सातारा येथे प्रशिक्षण पूर्ण विनामूल्य आहे. निवास व भोजन याचे तीन दिवसांचे शुल्क
रु.३००/- देणे अपेक्षित आहे. चमत्कार शिकल्यानंतर अंधंद्धा निर्मूलन चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना विशेष प्राधान्य.
प्रवेश मर्यादित. स्वत:चा सामाजिक कार्याचा तपशील, वय, शिक्षण, व्यवसाय यासह पत्र पाठवा. महाराष्ट्र अंनिस, परिवर्तन, सहयोग हॉस्पिटल, सदर बझार, सातारा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च २००९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा