अपक्ष
व्यासपीठात गेले पाहिजे
दाभोलकर, राजकीय भान, प्रबोधन, जनसंवाद
हा अंक हातात पडेल त्यावेळेला निवडणुकांचे पडघम जोराजोरात वाजत
असतील. अंधश्रद्धा निर्मूलन समिती निवडणुकीच्या राजकारणात नाही, हे खरे आहे. समितीमध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत.
ते आपापल्या निष्ठाप्रमाणे राजकीय प्रचार करतात. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समिती संघटना म्हणून कोणाचाही झिंदाबाद अगर मुर्दाबाद करत नाही. समितीने हे धोरण विचारपूर्वक
घेतलेले आहे. समितीतील बहुसंख्य कार्यकर्ते देखील कोणत्याच राजकीय पक्षाचे सभासद
नाहीत. म्हणूनच राजकीय घडामोडींवर नेहमी भाष्य करणे, ठराव मांडणे, आंदोलन करणे असे काम समिती करत नाही. समितीने
आखून घेतलेली ही मर्यादा आहे.
पण
म्हणजे आपण अराजकीय आहोत काय?
हा प्रश्न मी समितीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून तर विचारतच आहे; परंतु त्याबरोबर निवडणुकीच्या राजकारणात प्रत्यक्ष नसलेल्या आपल्या
मासिकाच्या हजारो वाचकांनाही विचारत आहे.
आम्ही राजकारणात नाही, असे म्हणण्याची फॅशन आहे. राजकारण म्हणजे
तत्त्वच्युती डावपेच, गुंडागर्दी, स्वत:च्या पोळीवर तूप ओढणे, कसलाही विधिनिषेध न बाळगणे, सतत उगवत्या सूर्याची आरती ओवाळणे, धर्माचा स्वार्थी हिंसक वापर करणे, या स्वरुपाचे असते, असे आज बहुसंख्यांचे मत झाले आहे. दुर्दैवाने त्यात बराच तथ्यांश आहे. परंतु
आम्ही राजकारण करत नाही, असे म्हणणारे बहुसंख्य लोक साळसूदपणाचा आवच
आणत आहेत, असे दिसते. नाक मुरडून आम्ही नाही त्या राजकारणातले, असे म्हणणे हेच एक मोठे राजकारण आहे. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आहे, त्यांचे लांगुलचालन; निदान तेथे आपला वशिला
लावण्याचे काम आम्ही नाही हो राजकारणात, असे म्हणणारी ही मंडळी
करत असतात. ही सर्व मंडळी प्रस्थापित असतात आणि स्वत:च्या पोटातले पाणीही न हलवता भरल्या
पोटावरून हात फिरवत राजकारणाला नावे ठेवत असतात. कारण त्यांना असेच सुखाने जगावयाचे
असते. ते जगायचे तर हेच प्रस्थापितांचे राजकारण कळत वा नकळत, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष करावयाचे असते. लोक खरे राजकारण करू लागले
तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. लोकांना जनहिताच्या रणधुमाळीत शिरण्यापासून
दूर ठेवायचे असेल, तर अनेक भूलभुलैय्ये उभे करावे लागतात. त्यातलाच
एक चलाखीचा डाव म्हणजे ‘राजकारणाशी आपला संबंध नाही’, असा टाहो फोडणे.
आजचे जीवन इतके वेगवान, गुंतागुंतीचे आणि पदोपदी शासनाला भिडणारे
झाले आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही त्या राजकारणाचे भाग बनताच. अशावेळी तुमच्यापुढे दोन पर्याय राहतात.
एकतर या घटनांचे मूक साक्षीदार बनणे; अन्यथा दुसरा म्हणजे आपली
असेल तेवढी ताकद एकत्र करून या घटनांना इष्ट वळण लावण्याचा प्रयत्न करणे. राजकारण हे
धनदांडग्यांचे आणि साध्य साधनशूचितेला तिलांजली देणाऱ्यांचे कार्यक्षेत्र आहे आणि त्यांना
हे जणू काही कायम आंदण मिळाले आहे,
असे आजचे रूप आहे. कष्टकरी
जनतेचे राजकारण प्रामाणिकपणे करणारे खूप कमी आहेत आणि त्यांचा प्रभाव तर त्याहून कमी
आहे.
जनतेचे खरे प्रश्न निवडणुकीत ऐरणीवर क्वचितच येतात. पर्यावरण, पुनर्वसन, मोठी धरणे, अंगमेहनती कष्टकरी, असंघटित कामगार, शेतमजूर या घटकांच्या व या स्वरुपाच्या अनेक अन्य घटकांच्या जित्याजागत्या
प्रश्नांना निवडणूक प्रचाराच्या भाऊगर्दीत फारच थोडे स्थान असते. मग दारूविरोधी समग्र
नीती जाहीर करा अथवा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करा, या बाबी तर दूरच राहिल्या.
यामुळे जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नावरील रचनात्मक लोकसंघर्षाचे राजकारण दूरच राहते.
या मर्यादा आहेत. हे खरेच आहे; पण तरीही हे सर्व स्वीकारून काही गोष्टी
निश्चित लावून धरता येतात.
विचार ज्यावेळी समुदायाची पकड घेतात, त्यावेळी ते सामाजिक शक्ती बनतात, असे एक प्रख्यात वचन आहे. आपल्याला जो विचार पटतो, त्याने समुदायाची पकड घ्यावी, यासाठी आपण सर्व पातळीवर
प्रबोधन करू शकतो. एक मतदार म्हणून एकटेपणाची किंवा थोडी संघटित क्षमता दाखवली, तर प्रबोधन व्यासपीठ या स्वरुपात संघटितपणे कँटीनमध्ये, बसमध्ये गप्पांच्या बैठकीत, वाचकांच्या पत्रव्यवहारात
खरे तर सर्वत्र कोठेही आपण आपल्याला हे जनहिताचे वाटते ते बोलले पाहिजे. आपणास आवश्यक
वाटणारे सर्व विषय या चर्चात नसणार हे नक्कीच आहे; पण ज्यामध्ये लोकांना
रस आहे त्याबाबत तरी ठाम भूमिका घेऊन बोलावयास नको काय? अगदी सहज सुचणारे काही मुद्दे असे जे आज या-ना-त्या स्वरुपात प्रचाराच्या
कुरुक्षेत्रावर मौजूद आहेत.
कारगिलमध्ये काही हजार कोटींचा चुराडा आणि शेकडो जवानांचे बलिदान, हे कोणामुळे घडले? या गाफीलपणाची कोणती सजा
दिली गेली? धर्माचा वापर निवडणूक प्रचारात केला तर विजयी
उमेदवाराची निवडणूक ही रद्द ठरते. म्हणून केवळ निवडणूक प्रचारात धर्मविद्वेष न आणणाऱ्या; परंतु आपले सारे राजकारण, संघटन त्या पायावर उभे
करणाऱ्या संघटनांच्या हातात सत्ता द्यावयाची काय? अणुबॉम्बनिर्मिती ही खरोखरच
इष्ट आहे की अनिष्ट?
जन्माने परकीय असलेल्या व्यक्तीला देशाच्या
सर्वोच्च पदावरून दूर ठेवण्याची मागणी, ही
विशिष्ट जात वा धर्म हा पुरेसा विश्वासार्ह नाही म्हणून त्यांना कमअस्सल वा अविश्वासार्ह
मानण्याच्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे काय? महाराष्ट्रात सध्याचे युतीचे शासन आणखी पाच
वर्षे सत्तेवर राहिले तर भरून न येणारे नुकसान होईल काय?
निवडणुकीत माणसे ऐकण्याच्या मूडमध्ये असतात. त्यांना ऐकवले पाहिजे.
प्रबोधनाने बदलवले पाहिजे. प्रतिगामी राजकीय विचारापासून दूर काढले पाहिजे आणि गुन्हेगार
नसणारे, प्रतिवर्षी स्वत:चे उत्पन्न जाहीर करणारे, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून जातील, हे पाहिले पाहिजे. यासाठी अपक्ष व्यासपीठ असेल तर त्यात गेले पाहिजे.
नसेल तर जसे शक्य असेल तसे हे प्रबोधन चालवले पाहिजे. राजसत्ता चळवळीला अनुकूल नसली
तरी एकवेळ चालेल; पण चळवळीला प्रतिकूल असणाऱ्या विचारांची
तरी नसावी, हे पाहावेच लागेल आणि दुसरे म्हणजे त्याही
पुढे जाऊन सामान्य माणसाचा विवेक जागृत आहे, संघटित आहे आणि समर्थ आहे. तो सिंहासने उलथून
पाडू शकतो आणि स्वत:ला इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो; या दिशेने एक पाऊल जरी पुढे पडले तरी फारच
उत्तम.
अंधश्रद्धा
निर्मूलन वार्तापत्र
(जुलै १९९९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा